Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका, २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. २२) अतिथी देवो भव ॥ २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा. २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा. २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका २६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. २८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्त्याने आणि सन्मानाने करा. ३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक. ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं. ३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो. ३४) परमेश्वराच्या आशीर्वादा शिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही. ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची ! ३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो. ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. ३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. ४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !! ४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही. ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो. ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी ४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही. ४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा. ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे. ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच. ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. ५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा. ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं. ५८) जगण्यात मजा आहेच पण त्याहून अधिक मजा फ़ुलण्यात आहे ५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते. ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र! ६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव ! ६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका. ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. ६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये. ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. ७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. ७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा. ७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे. ७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. ७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका. ७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका. ७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. ८०) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही. ८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. ८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. ८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं. ८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं. ८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते. ८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. ८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो. ८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. ८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. ९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही ९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही. ९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात. ९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. ९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन ! ९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे. ९६) अंथरूण बघून पाय पसरा. ९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात. ९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा. ९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. १००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच. १०१) सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात. १०२) सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. १०३) शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥ १०४) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात. १०५) विद्या विनयेन शोभते ॥ १०६) शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे. १०७) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा. १०८) एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही. १०९) कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. ११०) आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते. १११) ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही. ११२) कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. ११३) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ! ११४) आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. ११५) मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच ! ११६) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो. ११७) जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा. ११८) आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. ११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो. १२०) जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम ! १२१) लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. १२२) कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. १२३) जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका. १२४) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका. १२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. १२६) गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं ! १२७) कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो. १२८) स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता ! १२९) ज्यादिवशी आपली थोडी ही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा. १३०) जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार ! १३१) सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो. १३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो. १३३) आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तीन ही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. १३४) एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो. १३५) प्रेमाला आणि द्वेषाला ही प्रेमानेच जिंका. १३६) आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र ! १३७) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील ! १३८) स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात. १३९) अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात. १४०) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. १४१) आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. १४२) बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढला का ? १४३) कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधा शिवाय फुल आणि प्राणा शिवाय शरीर ! १४४) टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण मिळत नाही. १४५) नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका. १४६) यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे! .

गरज कृतीयुक्त शिक्षणाची



गरज कृतीयुक्त शिक्षणाची- 
शीतल बापट
शिक्षणविषयक बदलती ध्येयधोरणं कायमच चच्रेत असतात. आगामी काळात कोणत्या क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या मनुष्यबळाची किती आवश्यकता आहे, याचा कोणताही अभ्यास न करता शिक्षणविषयक धोरणं जाहीर केली जातात आणि लाखोंच्या संख्येने पदवीधरांचा ओघ दर वर्षी सुरू राहतो. एका शैक्षणिक वर्षाचं अखेरचं पर्व सुरू होत असताना शिक्षण प्रक्रियेतल्या या त्रुटींची चर्चा करायलाच हवी.
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही एक विशेष गुण असतो. तसा तो प्रत्येक विद्यार्थ्यांतही असतो. असे गुण ओळखून त्यांना वाव देणं, प्रगतीसाठी प्रोत्साहन देणं गरजेचं ठरतं. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला ख-या अर्थाने हातभार लागत असतो. खरं तर या संदर्भात पूर्वीच्या शिक्षण पद्धतीपासून वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले. परंतु शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं, औद्योगिक विकासाचं वारं वेगानं वाहू लागलं, त्यावेळी शिक्षणक्षेत्रात काही महत्त्वाचे बदल झाले. कारण या काळातल्या गरजा वेगळ्या होत्या. या प्रक्रियेत रोजगाराच्या दृष्टीने कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर दिला जात होता. त्याचा प्रभाव एवढा होता की, तीच प्रक्रिया शिक्षण पद्धतीतून पुढे सुरू राहिली. यात आऊटकमवर फोकस दिला जात आहे, मात्र इनपुटकडे लक्ष दिलं जात नाही. अर्थात, ग्लोबलायझेशनच्या या सुरुवातीच्या कालखंडातल्या शिक्षण पद्धतीचे काही चांगले परिणाम समोर आले, त्याचबरोबर काही दुष्परिणामही पाहायला मिळाले.
याचा सर्वात महत्त्वाचा अनुकूल परिणाम म्हणजे सार्वत्रिकीकरणामुळे शिक्षण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं; परंतु त्यातून निर्माण होणारी क्रिएटीव्हीटी साचेबद्ध राहिली. आणखी एक बाब म्हणजे या प्रक्रियेत अधिक प्रमाणात निपजलेली सेल्फ ओरिएंटेड मुलं इतरांशी स्पर्धा करू लागली; परंतु त्यांची स्वत:शी स्पर्धा नाही, असं दिसून आलं. शिवाय पालकांची मानसिकताही अशीच असायची. म्हणजे आपल्या मुलानं इतरांशी स्पर्धा करावी, असं पालकांना आवर्जून वाटायचं. त्यामुळे आपल्या मुलांनी वारंवार स्पर्धामध्ये भाग घ्यावा, असा पालकांचा आग्रह असतो. त्यातून प्रसंगी त्यांच्यावर दबाव आणला जातो. दहावी, बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी शाखेची निवड करण्याबाबतही असंच चित्र ब-याच प्रमाणात पाहायला मिळतं. आपल्या मुलाचा उपजत ओढा कोणत्या विषयाकडे आहे, त्याला कोणता विषय अधिक आवडतो, पुढे जाऊन तो स्वत: कोण होऊ इच्छित आहे, याचा विचार बहुतांश पालक करत नाहीत. त्यावेळी पालक आपल्याला वाटतो तो निर्णय मुलांवर लादतात. मग पुढे अशा मुलांची प्रगती नीट झाली नाही, तर त्याचं खापरही मुलांवरच फोडलं जातं. त्यातही एखाद्या शाखेतल्या शिक्षणाला अधिक वाव आहे, असं लक्षात आलं किंवा तशी माहिती कुणी तरी दिली की त्यावर विश्वास ठेवत मुलांना त्याच शाखेच्या शिक्षणासाठी पाठवलं जातं. यामुळे ठरावीक शाखांमध्ये विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी, तर अन्य शाखांमध्ये विद्यार्थ्यांची वानवा असं परस्परविरोधी चित्र उभं राहतं. यामुळे आज बेरोजगारी वाढलेली दिसत असली तरी काही क्षेत्रात कुशल कामगारांना मागणी असूनही ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचं पाहायला मिळतं.
या पार्श्वभूमीवर आता काळ बराच बदलला आहे. किंबहुना, विविध क्षेत्रात वेगानं घडामोडी घडत आहेत. प्रगत तंत्रज्ञानातही वेगानं होणारे बदल विस्मयचकीत करायला लावणारे आहेत. मात्र, हे बदल लक्षात घेऊन येत्या काळात निर्माण होणा-या संधींचा विचार करून शिक्षण पद्धतीत काही बदल केले जात आहेत का, हा खरा प्रश्न आहे. आजकाल संशोधन क्षेत्रात झपाटय़ाने बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा जणू स्फोट होतोय. मात्र, या सा-या परिस्थितीत शिक्षण पद्धत तशीच राहणं उचित आहे का, या प्रश्नाचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. वास्तविक, आता शिक्षण घेणारी मुलं २०३० मध्ये पदवीधर होणार आहेत. त्यावेळी विविध क्षेत्रात काय बदल झालेले असतील, कोणतं प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात येईल आणि त्या दृष्टीने कोणत्या नव्या संधी उपलब्ध होतील, त्यासाठीचे निकष काय असतील, त्या वेळच्या गरजा काय असतील, याचा विचार करून आजची शिक्षण प्रक्रिया राबवली जाण्याची आवश्यकता आहे. खरं तर हे सारे मुद्दे लक्षात घेऊन शिक्षणाची रचना ठरवणं अवघड किंबहुना, आव्हानात्मक आहे. त्या दृष्टीने आपण आजच्या शिक्षणाकडे पूर्वीच्याच मानसिकतेतून पाहणार का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे चेंज मॅनेजमेंट अर्थात बदलाला सामोरं जाण्याची तयारी आणि त्यासाठीचं व्यवस्थापन या बाबींना विशेष महत्त्व प्राप्त होणं गरजेचं आहे.
पूर्वी विद्यार्थ्यांसाठी पुस्तक आणि शिक्षक हेच ज्ञानाचे, माहितीचे मुख्य स्त्रोत असत. उर्वरित बाबी कुटुंबातून शिकायला मिळत असत. परंतु आता प्रगत माहिती-तंत्रज्ञानाच्या जमान्यात माहितीचं अवकाश अधिक व्यापक झालं आहे. या स्त्रोताच्या आधारे कुठलीही माहिती क्षणार्धात प्राप्त करणं शक्य होत आहे; परंतु या सा-या परिस्थितीत विद्यार्थ्यांची जीवनकौशल्यं विकसित होण्याच्या संधी कमी मिळतात, हे लक्षात घ्यायला हवं. सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या पाठांतरावर विशेष भर दिला जात आहे. त्याच प्रमाणे शिक्षक आणि पालकांकडून सततच्या अभ्यासासाठी दबाव टाकणं, त्यांना या क्षेत्रातल्या स्पध्रेविषयी सातत्यानं उपदेश करणं अशा स्वरूपाचे प्रयत्न होताना पहायला मिळतात. मात्र, यात मुलांना समजून घेणं, त्यांच्या क्षमता काय आहेत, मर्यादा काय आहेत या बाबी समजून घेतल्या जाणं अधिक महत्त्वाचं आहे आणि त्याची सुरुवात घराघरांतून व्हायला हवी. त्या दृष्टीने शिक्षकांनीही आपल्या भूमिकेत बदल करायला हवा. विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण आणि कृतीयुक्त शिक्षण द्यायला हवं. मुख्यत्वे परीक्षा पद्धत बदलण्याची गरज आहे. आजकाल विद्यार्थ्यांना स्वत:ला ओळखून करिअर गायडन्सच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याची विशेष गरज आहे. कारण कोणताही विद्यार्थी कौशल्यं आत्मसात करून वा उपजत कौशल्यात आणखी भर टाकत कारकिर्दीच्या दृष्टीने स्वत:ला सिद्ध करू शकतो. किंबहुना, स्वत:चं स्थान निर्माण करू शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना वाव दिला जाण्याची गरज आहे. थोडक्यात सांगायचं, तर वास्तवात परीक्षांच्या निकालाची टक्केवारी वाढवण्यापेक्षा त्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना किती ज्ञान मिळालं, याचा विचार होणं आवश्यक आहे.
खरं तर आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा सरकारचा निर्णय चांगला होता; परंतु या निर्णयाची नीट अंमलबजावणी झाली नाही. शिवाय वेगवेगळे अर्थ काढून या निर्णयावर टीकाच करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अन्य देशांमधील शैक्षणिक तसंच परीक्षा आणि मूल्यमापन पद्धती जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. आपल्याकडे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत स्पर्धात्मकता अधिक असून त्या मानाने संधींची वानवा पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पुढील प्रवेश सुलभ होणं हाच गुण मिळवण्याचा महत्त्वाचा निकष मानला जात आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही नववी, दहावीतच विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाचे वेध लागलेले असतात. वस्तुत: दहावीतल्या गुणांचं महत्त्व तेवढय़ापुरतंच असतं. आपल्याकडे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा प्रवेश सुकर होण्याच्या दृष्टीने महाविद्यालयांची संख्या वाढली आहे. परंतु ठरावीक महाविद्यालयांमध्येच प्रवेशासाठी अनेक विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचं पहायला मिळतं. डोक्यात बसलेल्या प्रवेशासाठीच्या अशा काही ठाम कल्पनांना छेद देण्याची गरज आहे.
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामध्ये काळाच्या ओघात बदल होत जाणं हे सुदृढ शिक्षणप्रणालीचं शिक्षण आहे. हे लक्षात घेऊन प्रचलित शिक्षण पद्धतीत कालसुसंगत बदल करत राहणं गरजेचं आहे. तसे बदल होत असले तरी त्यांची गती वाढण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सर्व घटकांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे ठरणार आहेत. शिक्षण प्रक्रियेत एक-एक मूल घडवणं म्हणजे बंदरात जहाज बांधण्यासारखं आहे. कोणतंही बांधलं जाणारं जहाज बंदरात सर्वात सुरक्षित असतं; परंतु त्याची रचनाच सागरात जाण्यासाठी करण्यात आलेली असते. त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या नौकेला २१व्या शतकात कुठली दिशा द्यायची, तिला कुठल्या वादळांचा, आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, याचा विचार करून त्या संदर्भात तयारी करून घेणं हे आजच्या शिक्षण पद्धतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
(लेखिका श्यामची आईफाऊंडेशनच्या संस्थापक संचालिका आहेत.)


No comments: